विशेष प्रतिनिधी / मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्र्यांनीही बचतीची नाटकं सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून विधानभवनात बुलेटवरून पोहोचले तर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे बॅटरी कारने मंत्रालय गाठलं. आणखी एक मंत्री नितेश राणे मंत्रालयासमोरील बंगल्यातून चालत मंत्रालयात पोहोचले. मात्र या मंत्र्यांच्या इव्हेन्टबाजीची नेटकऱ्यांनी चांगलीच खेचली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना चांगलाच आरसा दाखवला.
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये काटकसरीची एकच स्पर्धा लागली होती. स्वतः मुख्यमंत्री त्यात सहभागी झाल्याने तो एकच चर्चेचा विषय बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वर्षा निवासस्थानातून बुलेटवर प्रवास करून थेट विधान भवन गाठलं. विधानभवनात नव्या आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासाची चर्चा सुरू असताना तो एक इव्हेंटच बनला होता. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासाची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना पोचवण्यात आल्याने मोठ्या संख्येने फोटोग्राफर आणि वाहिन्यांचे कॅमेरे विधानभवनात जमा झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या इव्हेंटबाजीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आपलं वाहन सोडून बॅटरी वाहनाने मंत्रालयात पोहोचले. त्यांच्याही फोटो आणि शूटिंग वाहिन्यांचे प्रतिनिधी करत असल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे हे तर मंत्रालयाच्या समोरच राहतात. पण त्यांनीही इव्हेंटबाजी करून अगदी पाच मिनिटांचा अंतर चालत जात असल्याची शोबाजी केली. काल केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंत्रालयाजवळून मेट्रो प्रवास केला. तेव्हाही पत्रकार उपस्थित होते.
मंत्र्यांच्या या शोबाजीची नेटकऱ्यांकडून चांगलीच टर खेचली जात होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बुलेटची पीयूसी संपल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर दुसऱ्याने बुलेट ऐवजी बजाज कावासकी वापरली असती तर बुलेट इतकं इंधन लागलं नसतं असं म्हटलं. आणखी एकाने बुलेट पाण्यावर कधीपासून चालायला लागली असा सवाल केला. शिंदेंच्या शोबाजीची टिंगल करताना कोटींची उड्डाणं संपली काय असं विचारलं. नितेश राणे यांच्यावरही समाज माध्यमातून खरपूस टीका करण्यात आली.
तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाचीही चर्चा सुरु होती. एका मंत्र्याने आपल्या ताफ्यातील 17 पैकी 9 गाड्या कमी केल्याची मखलाशी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा धागा पकडून मंत्र्यांना 17 गाड्यांचा ताफा दिला कोणी अशी विचारणा करत मंत्र्यांना उघड पाडलं.






