महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर:
संगमनेर नगरपालिकेच्या नेहरू गार्डन परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सवरील संभाव्य कारवाईवरून आता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. येथील गाळेधारकांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी थेट पदवीधर आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना पत्राद्वारे तीव्र नाराजीचे निवेदन पाठवले आहे.
या पत्रामध्ये कतारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘संगमनेर व्हिजन २.०’ वरून थेट सवाल उपस्थित करत तीक्ष्ण शब्दांत घरचा आहेर दिला आहे. आपण सर्व महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते असून, ही शेवटची दाद मागत असल्याचे सांगत त्यांनी तांबे यांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रामुळे आता शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेहरू गार्डन येथील पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स संदर्भात नगरपरिषदेकडून एक कथित ऑडिट अहवाल सादर करण्यात आला आहे. ही इमारत धोकादायक असल्याचे दाखवून ती पाडण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, त्याबाबत गाळेधारकांना लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर शॉपिंग कॉम्प्लेक्स अत्यंत सुस्थितीत आहे आणि व्यापारी किंवा नागरिकांच्या दृष्टीने कोणताही तातडीचा धोका निर्माण झालेला नाही, असा दावा अमर कतारी यांनी निवेदनात केला आहे.
या गाळेधारकांकडून नगरपालिकेला दरवर्षी तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. असे असतानाही नगरपालिकेने ठराव क्र. ७९/२०२६ चा आधार घेत अचानक ही कारवाईचा सपाटा का लावला आहे, असा प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आणि भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना उध्वस्त करून रस्त्यावर आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचा थेट आरोप कतारी यांनी केला आहे. पालिका निवडणुकीदरम्यान जर ‘संगमनेर व्हिजन २.०’ मध्ये नेहरू गार्डनचे गाळे पाडण्याचा आणि व्यावसायिकांना रस्त्यावर आणण्याचा उल्लेख केला असता, तर जनतेने ९० टक्के बहुमत देताना नक्कीच विचार केला असता, असा टोला त्यांनी लगावला.





