महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर :
संगमनेरमध्ये आरटीओच्या माध्यमातून होणाऱ्या कॅम्पमध्ये एजंटांकडून सर्वसामान्य वाहन चालकांकडून अवाजवी पैसे घेत असल्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी वडगाव पान येथील कॅम्पला अचानक भेट दिली आणि तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत, एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि वाहनचालकांना थेट सेवा मिळायला हवी अशी भूमिका मांडली.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी वाहन परवाना धारक आणि वाहनचालकांसाठी विशेष कॅम्प आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये काही एजंटांकडून सर्वसामान्य वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खताळ यांनी अचानक घटनास्थळी दिलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव पान साठवण तलावात आलेले पाणी तळेगावसह २१ गावांना सोडण्याच्या कार्यक्रमासाठी आज (बुधवारी) आमदार अमोल खताळ गेले होते. हा कार्यक्रम आटोपून संगमनेरकडे परतत असताना, त्यांनी वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पमध्ये चाललेल्या कामकाजाची आणि नागरिकांच्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता कॅम्पला भेट दिली.
लोकप्रतिनिधींनी अचानक भेट दिल्याने कॅम्पमधील आरटीओ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची काही काळ धांदल उडाली. आमदारांनी स्वतः पुढे होऊन तिथे उपस्थित असलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला आणि त्यांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या.
याप्रसंगी अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, शासनाच्या विविध सेवा सहज आणि सुलभपणे मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यासाठी त्यांना एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सर्वसामान्य वाहनचालकांची कोणत्याही स्तरावर अडवणूक किंवा आर्थिक लूट होत असेल, तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे. कार्यालयाच्यावतीने सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास होता कामा नये, असे निर्देश त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
परिवहन मंत्र्यांशी थेट संपर्क आणि संगमनेर कार्यालयाची मागणी….
वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पच्या ठिकाणाहूनच आमदार खताळ यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी परिवहन विभागाच्या ग्रामीण भागातील कामकाजात अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्याबाबत आग्रही विनंती केली. आमदारांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, ज्या अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि संगमनेरच्या मागणीबाबत योग्य पावले उचलली जातील, असे आश्वासन परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.




