महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक:
सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अटक केल्यानंतर शासकीय वाहनातून नेत असताना संशयित तलाठ्याने लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा ‘फिल्मी’ प्रयत्न केला, मात्र एसीबीच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता फसला.
पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, रा. देवळा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून प्रशांत दावल सोनवणे (वय २४) असे त्याला मदत करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? – खामखेडा शिवारात एका शेतकऱ्याची जमीन आहे. या जमिनीवरील बहिणीचे नाव हक्कसोड पत्रान्वये कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी पप्पू सोनकांबळे याच्याकडे अर्ज केला होता. मात्र, तलाठ्याने बहिणीच्या नावासोबत मूळ तक्रारदार शेतकऱ्याचेही नाव सात-बारावरून कमी करून टाकले. हा गोंधळ समोर आल्यानंतर शेतकऱ्याने विचारणा केली असता, नाव पुन्हा सात-बारावर चढवण्यासाठी तलाठ्याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तर खाजगी व्यक्ती प्रशांत सोनवणे याने शेतकऱ्याला लाच देण्यासाठी प्रवृत्त केले.
शेतकऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून ५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी सोनकांबळे आणि त्याच्या साथीदाराला रंगेहात पकडले. कारवाईनंतर दोघांना शासकीय गाडीत बसवून नेले जात असताना, तलाठ्याने खिशातील लाचेची रक्कम खिडकीबाहेर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




