महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुका महसूल स्थळ सीमा हद्दीत तब्बल १९ जणांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रवेशबंदीचा आदेश शनिवारपासूनच (दिनांक २३ मे) लागू झाला असून, तो दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना संगमनेर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आणि शांततेस बाधा ठरण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अलीम जलील कुरेशी, हश्मी नासीर कुरेशी, मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी, कमरअली गुलाम दिलानी सौदागर, अनिस गुलाम हैदर कुरेशी, काशिद असद कुरेशी आणि रेहान गुलाबनबी कुरेशी यांचा समावेश आहे.
तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गणेश दगडु कदम, यासीर अकबर कुरेशी, अन्वर मोहमंद कुरेशी, बाळा रमेश रुपवते आणि सोमनाथ मारुती रुपवते यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मुबारक रशिद शेख व अन्वर नबाब शेख आणि घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इकरार इसकार मोमीन अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील भिमा दगडु कांगणे, सुनिल भाऊसाहेब खरात आणि सचिन सुदाम जाधव राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील शाहरुख निसार शेख अशा एकूण १९ जणांविरुद्ध हे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


