महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक:
उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना कश्यपी धरणावर घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच परिसरातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात आणि मूळ गावी तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे दोन वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे.
मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले सचिन कैलास ठोंबरे हे सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात वास्तव्यास होते. सुटी साजरी करण्यासाठी सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन मुले असे सर्वजण मंगळवारी हरसूल-त्र्यंबकेश्वर जवळील कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले होते.
धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि निसर्गरम्य वातावरण पाहून संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हे सर्वजण पाण्यात पोहण्याचा व आंघोळीचा आनंद घेण्यासाठी उतरले. मात्र, धरणाच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक त्यापैकी एकजण खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर तिघेजणही एकापाठोपाठ एक पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले.
एकमेकांना वाचवण्याच्या या आकांतामध्ये सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी आणि शेजारी राहणारे केतन अनिल पवार (१६) व कौशल अनिल पवार (१४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या संपूर्ण दुर्घटनेत ठोंबरे दांपत्याची दोन वर्षांची चिमुरडी मुलगी मात्र सुदैवाने बचावली. ती धरणाच्या काठावर एकटीच पाण्याच्या दिशेने जात असल्याचे तेथून जाणाऱ्या संगीता घाडगे या महिलेच्या निदर्शनास आले. लहान बाळ एकटेच पाण्यात जात असल्याचे पाहून संगीता यांनी कसलाही विचार न करता धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. मात्र, बाहेर आल्यानंतर ती चिमुरडी रडत-रडत ‘मम्मी-पप्पा’ म्हणत पाण्याचा दिशेने बोट दाखवू लागली.
बाजूलाच पडलेले चपलांचे जोड आणि मुलीचे रडणे पाहून तिथे काहीतरी मोठी दुर्घटना घडल्याचा संशय संगीता घाडगे यांना आला. त्यांनी तातडीने आरडाओरड करून धरणाजवळ कुस्तीच्या स्पर्धेसाठी जमलेल्या स्थानिक नागरिकांना आणि तरुणांना मदतीसाठी बोलावले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उड्या घेतल्या आणि बुडणाऱ्यांचा शोध सुरू केला. काही वेळातच त्यांनी चौघांनाही पाण्याच्या बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही जीव गेला होता. मृत महिलेच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉल्सवरून अखेर या मृतांची ओळख पटली आणि त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला.
मूळचे संगमनेरच्या पिंपरणे गावचे असलेले ठोंबरे दांपत्य आणि मखमलाबाद येथील दोन कोवळ्या मुलांचा असा अचानक अंत झाल्याची बातमी समजताच पिंपरणे गावासह मखमलाबाद परिसरावर शोककळा पसरली आहे. केवळ दोन वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यात यश आले असले, तरी तिचे आई-वडील आता कधीही परत न येणाऱ्या जगात निघून गेले आहेत, ही जाणीव उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारी होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






