Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — दिना बामांच्या पुण्याईला खा. संजय पाटलांचा काळीमा
विश्लेषण

रविवार विशेष लेख — दिना बामांच्या पुण्याईला खा. संजय पाटलांचा काळीमा

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2026No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

भांडुपचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते, ज्यांच्या नावावर गिरणी कामगारांच्या असंख्य चळवळी झाल्या; जे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील काही मोजक्या नेत्यांमधील एक होते, अशा दिना बामा पाटील यांची पुण्याई अनेक वर्षे त्यांचे पुत्र खासदार संजय पाटील यांच्या कामी आली. सत्तरीच्या दशकात मुंबईत विशेषत: भांडुप, मुलुंड आणि पूर्व उपनगरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिना बामा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख मोठा होता. या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. शिवसेनेसारख्या बालेकिल्ल्यात एक काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे तेव्हा दिनांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. इतकी लोकप्रियता या नेत्याची होती.
मुंबईची कामगार चळवळ असो की गिरणी कामगारांची चळवळ असो, दिनांची तोफ धडाडणार नाही असं कधीच व्हायचं नाही. ही चळवळ फोफावण्यामागे जी काही मोजकी नावं घेतली जात, त्यात दिनांचं नाव घेतल्यावाचून पुढे जाता येत नसे. दिनांच्या याच दातृत्वामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांच्या पत्नी मनोरमा पुढे सातवेळा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या; तर त्यांचा पुत्र संजय आमदार आणि खासदार बनला. जुन्या पिढीतील कार्यकर्ते आजही दिनांची ओळख ‘लोकनेता’ म्हणून करताना दिसतात. इतका दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी संवाद असलेले ते नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मुंबईत इतरांना जे जमलं नाही, ते दिनांनी करून दाखवलं. सेनेसारखं कार्यकर्त्यांचं तगडं संघटन त्यांनी उभं केलं आणि मुंबईत काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने उभा राहू शकला.
अशा दिना बामा पाटील यांनी स्वकर्तृत्वाने जे कमावलं, जी पुण्याई मिळवली, ती त्यांच्या पुत्राने म्हणजे खासदार संजय पाटील यांनी गमावल्याची भावना आता मुंबईकरांमध्ये घर करत आहे. काँग्रेस पक्षाने दिलेला वैचारिक वारसा संजय यांनी केव्हाच पायदळी तुडवला. दिनांच्या जाण्यानंतर हा वारसा जपण्याची जबाबदारी काँग्रेसने संजय पाटील यांच्याकडे सोपवली होती. दिनांच्या लोकसंपर्काचा फायदा घेत २००४ साली ते राज्य विधानसभेवर निवडून आले. मात्र, स्वार्थीपणामुळे ते पुढे कोणाचेच राहिले नाहीत. अनेक राजकीय उड्या घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास धरली आणि ते शरद पवारांचे झाले. पवारांच्या जनसंपर्काचा फायदा घेत ते २००९ मध्ये लोकसभेवर निवडून आले. पुढे मुंबईतील बदलती राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादीला तिलांजली देत ते शिवसेनावासी झाले.
शिवसेनेत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पूर्व मतदारसंघाची जबाबदारी सोपवत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. खासदारकीचं तिकीट देऊन महाविकास आघाडीतून त्यांना विजयीही केलं. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची मोटार रॅली (रोड शो) झाली, त्या मुंबईतील मतदारसंघात मिहीर कोटेचा यांचा पराभव करत संजय यांनी भाजपला मोठा धक्का दिला होता. अशा या खासदार संजय यांनी आता शिवसेनेचा केसाने गळा कापल्याची जोरदार टीका मुंबईत होत आहे. संकटात सापडलेल्या पक्षाला हात देण्याऐवजी संजय यांनी पाठ दाखवून स्वतःचं ‘अवलक्षण’ करून घेतल्याची भावना मुंबईकरांची झाली आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेल्या गर्दीने हेच दाखवून दिलं.
सध्या या संजय पाटलांनी पत्रकारांशी बोलताना वापरलेल्या शिवराळ भाषेचीच चर्चा सुरू आहे. मुंबईसारख्या सुजाण आणि शुचिर्भूत शहरातून निवडून आलेला खासदार; संजय गायकवाड वा संजय शिरसाट यांच्याप्रमाणे तोंडाचा शिवराळ चंबू करू शकतो, हे पाहून मुंबईकरांनी कपाळावर हात मारला असल्यास नवल नाही. ज्या काँग्रेस विचारांनी त्यांच्या पंखात लढण्याचं बळ दिलं, ज्या शरद पवारांनी लढण्याची ताकद दिली आणि ज्या शिवसेनेने संकटातही दिला शब्द पडू न देता खासदार म्हणून निवडून दिलं; त्या शिवसेनेला वाऱ्यावर सोडून संजय जेव्हा सत्तेत सामील झाले, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले जाणं स्वाभाविकच होतं. परंतु, शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन आपण मतदारसंघावर जणू उपकारच केले, अशा आविर्भावात हे खासदार वागत आहेत.
सेनेचे सहा खासदार फुटतात याची जाणीव झाल्यावर बोलवण्यात आलेल्या बैठकीला “आताच विमान पकडून येतो,” असं खोटं सांगून त्यांनी सेनेच्या नेतृत्वाला अक्षरशः फसवलं. इतक्यावरच हे थांबलं असतं तर ठीक होतं, पण इतर फुटीरांप्रमाणेच संजय यांनीही तारे तोडायला सुरुवात केली. ते सांगू लागले—”निधी मिळत नाही,” ते म्हणू लागले—”उद्धव ठाकरे भेटत नाहीत,” ते बडबडू लागले—”मान-सन्मान मिळत नाही.” त्यांची ही सारी निमित्तं लोकांना वेड्यात काढणारी ठरली आहेत. निधी मिळत नाही असं सांगणाऱ्या या माणसाने यावेळच्या निधीचा २० टक्के इतकाही खर्च आपल्या मतदारसंघात केला नाही, हे आता उघड झालं आहे. यावरून निधीचं कारण हे केवळ एक निमित्त होतं, हे स्पष्ट होतं.
“उद्धव ठाकरे भेटत नाहीत,” हे पालूपद याआधीच्या फुटीरांचंही होतं. त्याच फुटीरांना अस्मान दाखवत उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून प्रचार केला. याचा थेट फायदा आता निवडून आलेल्या संजय यांच्यासारख्यांना झाला. तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे भेटत नाहीत असं वाटलं नाही. राजकीय पक्षात मान-सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो. आपल्याला मोठं करण्यात ज्या ज्या पक्षाने खस्ता खाल्ल्या, त्या एकाही पक्षाला संजय न्याय देऊ शकले नाहीत. तिथे शिवसेनेला चांगले दिवस यावेत म्हणून संजय यांनी काय केलं? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर काय देणार? उलट, पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून अशा पळपुट्यांचं पुनर्वसन करून पक्षनेतृत्वाने संजय यांच्यावर उपकारच केले होते.
अशा प्रसंगी पत्रकारांनी मौनी राहावं, त्यांनी ‘गोदी मीडिया’ बनावं, त्यांनी मान खाली घालून निमूट वाकावं, असं जर संजय यांना वाटत असेल तर ते स्वतःची अक्कल पाजळत आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो. “सत्ताधारी पक्षात सामील झालो म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारू नये,” अशीच मानसिकता आजच्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे. ज्या पक्षाचा आमदार संजय गायकवाड कसाही वागू शकतो, ज्या पक्षाचे मंत्री संजय शिरसाट सत्तेचा धर्म पायदळी तुडवत असतानाही जिथे जाब विचारला जात नाही, तिथे या संजयचं काही बिघडेल असं वाटत नाही. उलट, ज्या पक्षात प्रवेश घेतला त्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय यांना सावरण्याचा प्रयत्न केला. “त्यांना तसं बोलायचं नव्हतं,” असं सांगत शिंदे यांनी संजय यांच्या वाह्यातपणालाच खतपाणी घातलं आहे.
मुंबईतला खासदार शिव्या देताना कोणती खालची पातळी गाठतो, हे पाहायचं असेल तर संजय यांच्या वक्तव्यांकडे पाहावं लागेल. ‘शिवराळ भाषा फक्त आपल्यालाच येते’, असा एक समज सत्ताधारी नेत्यांचा झाला आहे. मध्यंतरी अशाच शिवराळ विकृतीचं दर्शन भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम यांनी घडवलं होतं. सत्तेतला मोठा नेता शिव्यांची अशी लाखोली वाहत असेल, तर आपल्यालाही तो अधिकार असल्याचं संजय यांना वाटत असावं. ते केवळ शिव्या देऊन थांबले नाहीत, तर “आलात तर मारून पाठवेन,” असा दम त्यांनी पत्रकारांना दिला. बरं, त्याहून कहर म्हणजे “याआधी पाच जणांना मी असंच मारलंय,” असं सांगून त्यांनी आपल्या कृत्याची कबुली चक्क पोलिसांच्या समक्ष दिली. याची दखल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी तात्काळ घेतली पाहिजे. दिना बामांनी जनसेवा करताना कधीच असा वायफळपणा केला नाही.
हा खासदार इतक्या टोकाला का गेला, हेही लक्षात घेतलं पाहिजे. खासदारावर होत असलेल्या आरोपांची शहानिशा करण्याची जबाबदारी असलेले अनेक पत्रकार ‘आपल्याकडे पाणी भरतात’, असं हा खासदार उघडपणे सांगत आहे. संजय यांचं पाणी भरणारे हे पत्रकार कोण, हेही एकदा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. जे पाणी भरतात तेच प्रश्न विचारतात म्हणजे काय? ‘खायचं आमचं आणि प्रश्नही आम्हालाच विचारणार?’ अशा लाळघोटेपणा करणाऱ्या पत्रकारांसाठी हा एक धडा आहे. जे काळं कृत्य करतात त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागतात. पैशासाठी इमान विकणाऱ्यांची अखेर अशीच होते. मात्र, ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही, अशा सर्व पत्रकारांना एकजात दोषी ठरवण्याचा अधिकार खासदार संजय यांना नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. वाद अंगाशी आल्यावर अति झाल्यावर त्यांनी माफीनामा दिला आहे; मात्र भाषेचा स्तर आणि त्यातील अहंकार लक्षात घेता, संजय यांचं हे कृत्य दिना बामा पाटील यांच्या पुण्याईवर वरवंटा फिरवणारंच ठरलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 266
प्रवीण पुरो रविवार विशेष रविवार विशेष लेख विश्लेषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

09/08/2026

रविवार विशेष लेख ऑगस्ट क्रांती दिन : स्वातंत्र्याच्या मशालीपासून लोकशाहीच्या रक्षणापर्यंत

09/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.