
भांडुपचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते, ज्यांच्या नावावर गिरणी कामगारांच्या असंख्य चळवळी झाल्या; जे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील काही मोजक्या नेत्यांमधील एक होते, अशा दिना बामा पाटील यांची पुण्याई अनेक वर्षे त्यांचे पुत्र खासदार संजय पाटील यांच्या कामी आली. सत्तरीच्या दशकात मुंबईत विशेषत: भांडुप, मुलुंड आणि पूर्व उपनगरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिना बामा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख मोठा होता. या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. शिवसेनेसारख्या बालेकिल्ल्यात एक काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे तेव्हा दिनांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. इतकी लोकप्रियता या नेत्याची होती.
शिवसेनेत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पूर्व मतदारसंघाची जबाबदारी सोपवत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. खासदारकीचं तिकीट देऊन महाविकास आघाडीतून त्यांना विजयीही केलं. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची मोटार रॅली (रोड शो) झाली, त्या मुंबईतील मतदारसंघात मिहीर कोटेचा यांचा पराभव करत संजय यांनी भाजपला मोठा धक्का दिला होता. अशा या खासदार संजय यांनी आता शिवसेनेचा केसाने गळा कापल्याची जोरदार टीका मुंबईत होत आहे. संकटात सापडलेल्या पक्षाला हात देण्याऐवजी संजय यांनी पाठ दाखवून स्वतःचं ‘अवलक्षण’ करून घेतल्याची भावना मुंबईकरांची झाली आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेल्या गर्दीने हेच दाखवून दिलं.
अशा प्रसंगी पत्रकारांनी मौनी राहावं, त्यांनी ‘गोदी मीडिया’ बनावं, त्यांनी मान खाली घालून निमूट वाकावं, असं जर संजय यांना वाटत असेल तर ते स्वतःची अक्कल पाजळत आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो. “सत्ताधारी पक्षात सामील झालो म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारू नये,” अशीच मानसिकता आजच्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे. ज्या पक्षाचा आमदार संजय गायकवाड कसाही वागू शकतो, ज्या पक्षाचे मंत्री संजय शिरसाट सत्तेचा धर्म पायदळी तुडवत असतानाही जिथे जाब विचारला जात नाही, तिथे या संजयचं काही बिघडेल असं वाटत नाही. उलट, ज्या पक्षात प्रवेश घेतला त्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय यांना सावरण्याचा प्रयत्न केला. “त्यांना तसं बोलायचं नव्हतं,” असं सांगत शिंदे यांनी संजय यांच्या वाह्यातपणालाच खतपाणी घातलं आहे.
