नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत.
गुळवे वस्तीवर राहणाऱ्या गुळवे कुटुंबाच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेशचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. हा प्रकार त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी क्षणाचाही विचार न करता नातवाचे प्राण वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्याच्या प्लास्टिक कागदावरील निसरडेपणा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात अडकले आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.