महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेला निसर्गरम्य ‘तामकडा’ धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे.
जलपूजनानंतर बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. बाळेश्वर पर्वतावरून वाहणाऱ्या नदीमुळे घाटातील हा सुंदर तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अनेक पर्यटक व नागरिक या ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात. मात्र, पर्यटनाचा आनंद लुटताना तरुणांनी सेल्फी घेण्याचा मोह टाळून स्वतःच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण व कॉंक्रिटीकरण पूर्ण होऊन घाटात अद्ययावत रस्ता तयार झाला आहे, यामुळे अपघात रोखण्यास मदत झाली आहे. तसेच तालुक्यात बंधारे आणि नालाबंडिंगचे जाळे निर्माण केल्यामुळे मोठी जलसंपत्ती साठवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे मोठी जलसमृद्धी निर्माण झाली असून हा तामकडा आनंदवाडी व चंदनापुरी परिसरासाठी वरदान ठरेल.
या जलपूजन सोहळ्यास कैलास सरोदे, अनिल कढणे, मुरलीधर सरोदे, पप्पू गोसावी, विनोद राहणे, दगू राहणे, ज्ञानेश्वर सरोदे, निलेश सरोदे, अर्चना भालेराव, जयसिंग सरोदे, नंदू राहणे, सोमनाथ सरोदे, भाऊराव रहाणे, बबन सरोदे, बाबाजी सरोदे, जगन राहणे, रविराज सरोदे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.