कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता नसून, आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक काम परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजे कर्मयोग आहे. कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता प्रत्येक कृतीतून अंतःकरणातील ईश्वराशी संवाद साधणे, हाच संत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन गीता विशारद् डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात डॉ. मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करत होते.
‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ या विषयावर बोलताना त्यांनी कर्मापासून पळून जाण्याऐवजी कर्मातच साधना शोधण्याचा ज्ञानेश्वरीचा मार्ग उपस्थितांसमोर स्पष्ट केला. माणसाच्या आयुष्यात श्वास असेपर्यंत कर्म अटळ आहे, त्यामुळे कर्म सोडून देणे म्हणजे संन्यास नव्हे. उलट, आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने पार पाडणे हाच खरा संन्यास आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
आपल्या निरुपणादरम्यान त्यांनी विविध प्रातिनिधिक प्रार्थनांच्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धता आणि बाह्य कर्माची सांगड घालून दिली. घर, व्यवसाय, समाज आणि नाती सांभाळत असताना अंतःकरणात ईश्वराची जाणीव ठेवून केलेले कोणतेही सामान्य काम कर्मयोगात रुपांतरित होते, हा सूक्ष्म विचार त्यांनी संगमनेरकरांच्या मनःपटलावर बिंबवला.
या व्याख्यानाला लाभलेल्या संगीताच्या सुरेल साथीमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा भाव आणि संगीताचे माधुर्य यांच्या मिलाफामुळे श्रोते भावविश्वात रंगून गेले.
संगमनेरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात राजस्थान युवक मंडळाची ही व्याख्यानमाला दरवर्षी श्रावणमासात एक वैचारिक पर्वणी ठरते. यंदाच्या सोहळ्याची सुरुवात कीर्तनचंद्रीका रोहिणी परांजपे यांच्या कीर्तनाने झाली असून, डॉ. संजय मालपाणी यांच्या दोन दिवसीय निरुपणाने या त्रिवेणी संगमाची उंची आणखी वाढवली आहे.
या कार्यक्रमास राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, शुभम राठी, दर्शन भंडारी, ओम इंदाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे सचिव कृष्णा आसावा यांनी वक्त्यांचा परिचय करून देत सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.