संगमनेरमधील चौपदरीकरणाच्या कामांचे मंत्री पटेलांच्या हस्ते व महसूल मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले.

संगमनेरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्रमांक ७१ अ या ६० किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे, नितीन दिनकर, सुनिल वाणी आदी उपस्थित होते.

पटेल म्हणाले, भाजप सरकारच्या काळात देशात गावा-गावांना जोडणारे पक्के रस्ते निर्माण झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान सडक योजनेमुळे देशात रस्त्यांचे पथदर्शी काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशाला नवीन २० योजना दिल्या. त्या माध्यमातून देशात मुलभूत व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले.
येत्या २०३० पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी असेल. अन्न प्रक्रिया व जलशक्ती मंत्रालयाचे बजेट ६० हजार कोटींचे आहे. यातील १० हजार कोटी अन्न प्रक्रिया उद्योगांना मदतीसाठी खर्च केले जाणार आहेत.
जलजीवनमध्ये प्रत्येक व्यक्तीला सन २०२४ पर्यंत प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेत आतापर्यंत १८ हजार कोटी खर्च करण्यात आला आहे. लोकांना योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांच्या समस्या ही समजून घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, योगराज सिंह परदेशी, ॲड. बापूसाहेब गुळवे, गोकुळ लांडगे, दीपक भगत, मेधा भगत, सिताराम मोहरीकर, डॉ. अरुण इथापे, अमोल खताळ, किशोर नावंदर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

