महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात अद्यापही अनिश्चितता असली तरी जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे या पदासाठी आता राजकीय पक्षांना तेवढाच मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे.

ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपवणाऱ्या राज्यभरातील 7675 ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडत असल्याचे स्पष्ट होत नाही तोच, जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्हानिहाय आरक्षण असे :
अहमदनगर -अनुसूचित जमाती, ठाणे – सर्वसाधारण, पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण, रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक – सर्वसाधारण (महिला), धुळे – सर्वसाधारण (महिला), नंदुरबार – अनुसूचित जमाती (महिला), सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सातारा – नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला), सांगली – सर्वसाधारण (महिला), कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला), औरंगाबाद – सर्वसाधारण, बीड – अनुसूचित जाती, उस्मानाबाद – सर्वसाधारण (महिला), परभणी – अनुसूचित जाती, जालना – नागरिकांचा मागस प्रवर्ग, लातूर – सर्वसाधारण (महिला), हिंगोली – सर्वसाधारण (महिला), अमरावती – सर्वसाधारण (महिला), यवतमाळ – सर्वसाधारण, बुलढणा – सर्वसाधारण, वाशिम – सर्वसाधारण, नागपूर – अनुसूचित जमाती, वर्धा – अनुसूचित जाती (महिला), चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला), गोंदिया – नागरिकांचा मागस प्रवर्ग, गडचिरोली – नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भातील आयोगाच्या सूचना ग्रामविकास विभागाला प्राप्त होऊन काही तास उलटत नाही तोच राज्याचा ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात हा मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष पदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अध्यक्ष पदाच्या आरक्षणाला राजपत्रातून प्रसिद्धी मिळाल्याने अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना अनुसूचित जमातीचा सक्षम उमेदवार अध्यक्षपदासाठी शोधावा लागणार असून संभाव्य पक्षांकडून त्या दृष्टीने हालचाली सुरू होतील अशी चिन्हे आहेत.

