महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित होते. प्रा. बाविस्कर यांच्या ‘भुरा’ या आत्मचिंतनपर परिसंवादात डॉ. दीनानाथ पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात परिसंवाद घेतला.
बाविस्कर म्हणाले, मी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मोठे झालो. बोलीभाषेला कायम प्राधान्य दिले. शिक्षण हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करून त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे असते. बौद्धिक क्षमतेचा विकास मातृभाषेमुळेच होतो. पूर्वी धार्मिकतेसाठी शिक्षण घेतले जायचे मात्र आता प्रत्येकाला बौद्धिक विकास व व्यक्त होण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे.
शिक्षणामुळे प्रश्न निर्माण होतात. प्रश्नांतून बौद्धिक चिकित्सा वाढते. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असून तो का व कसा आहे हे प्रत्येकाला कळाले पाहिजे. सध्या नागरिक नव्हे तर भक्त घडवण्यासाठी शिक्षणाकडे काही लोक पाहत आहेत. साहित्य, संस्कृती, शिक्षणाचे लोकशाहीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती ठोंबरे यांनी तर प्रा. शिवाजी नवले यांनी आभार मानले. यावेळी शहरातील वाचनप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीवनात संघर्ष अपरिहार्य असतो. त्या संघर्षातून उभे राहण्यासाठी शिक्षण चांगले साधन आहे. प्रत्येकाने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिकले पाहिजेत.
रंगनाथ पठारे, साहित्यिक.
वाचनामुळे जीवनाला समृद्धी प्राप्त होते. सर्वांनी वाचनावर भर दिला पाहिजे. संगमनेरमध्ये वाचन चळवळ मोठी असून या शहराला एक साहित्यिक परंपरा लाभली आहे.
दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष.

