मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८
बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न
चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून केंद्र सरकारकडूनही पंतप्रधानी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पहाटे नांदूर फाटा येथील दुर्घटनेचे वृत्त समोर येत नाही तोच जिल्ह्यातील वणी गडावर जात असतांना प्रवासी बसला अचानक आग लागली. अचानकपणे घडलेल्या या प्रकारानंतर प्रवाश्यांनी सतर्कता दाखविल्याने सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत जिवीतहानी झाली नाही. दोन्ही घटनांमध्ये बसचे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या अपघाताप्रकरणी सहवेदना व्यक्त करत पंतप्रधान निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाखाची व जखमींना पन्नास हजाराची मदत जाहीर केली.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने विमानाने नाशिकमध्ये आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, आयुक्तांशी चर्चा केली. शोक व्यक्त करत त्यांनी चौकशीचे आदेश दिले. मृतकांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सुचना देण्यात आले. जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीदेखील यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात जात माहिती घेतली. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनीदेखील यासंदर्भात चौकशीचे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांकडून फोनवरुन माहिती घेत घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
नाशिकचे पालमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रीया सुळे, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री छगन भुजबळ आदींनीदेखील यासंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे.

