महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून पडल्यामुळे या तारेचा धक्का लागून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला. सख्खी भावंडे यात मृत्युमुखी पडल्याने तालुक्याच्या पठार भागात शोककळा पसरली.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या नांदूर खंदरमाळवाडी गावात ही घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. ओमकार अरुण बर्डे (वय १० वर्ष’ अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्षे) आणि विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली.
महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत तातडीने संबंधितांना सूचना केल्या घडलेला प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आला असून महावितरणचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. तालुक्यातील पठार भागात असलेल्या घारगाव नजीकच्या खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे असलेल्या एका छोट्या तळ्यात आंघोळीसाठी हे चारही भावंड गेली होती. यावेळी तेथे तुटलेल्या विज वाहक तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने त्यांना धक्का लागला. त्या पाण्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.
दुर्दैवी घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस कर्मचारी राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे आदींसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही भावंडांचे मृतदेह तळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शव विच्छेदनासाठी संगमनेरला आणण्यात आले असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
तलावाकडे जाणारा रस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला असून या खराब रस्त्यामुळे चारही बालकांचे मृतदेह झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. नागरिकांनी वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. दुर्दैवी घटनेत एकाच वेळी चार बालकांचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बालकांच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी असलेल्या अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले.

