महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.
पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह छोट्याशा तळ्यातील पाण्यात उतरल्याने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून वीज वितरण कंपनी विरोधात या परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंदरमाळवाडी परिसरात मोल मजुरी करणारे गरीब आदिवासी बर्डे भावंड रहात असून शनिवारी या दोघा भावंडांची चार मुले वांदरकडा येथे घराजवळ असलेल्या एका नालासदृश्य छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेली होती. यावेळी तेथे तुटलेल्या विज वाहक तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या चारही भावंडांना विजेचा जोराचा धक्का लागला. त्या पाण्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने ईमेलद्वारे ही माहिती कळविली. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी या पत्राद्वारे लोखंडे यांनी केली आहे. रविवारी खासदार मुंबईत असल्याने सायंकाळी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मृताच्या वारसांना मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची खासदार लोखंडे यांची मागणी
मुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या भेटीनंतर मदत जाहीर करण्याची शक्यता

