महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमनेर तालुक्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच, सांगलीतील बिळूरमध्ये एका तलावात तीन मुलींसह आईचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह तलावा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
सुनिता माळी (वय ३० वर्ष), अमृता (वय १३ वर्ष), अश्विनी (वय १० वर्ष) आणि ऐश्वर्या (वय ७ वर्ष) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या संदर्भातील नेमकी घटना काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनास्थळी आढळलेल्या कपडे आणि कपडे धुण्याच्या साबणावरून प्राथमिक अंदाजानुसार सुनिता आपल्या मुलींसह या तलावावर कपडे धुण्यासाठी आल्या असाव्यात, असे सांगितले जाते.
चौघीही तलावात कशा पडल्या याबाबत समजू शकले नाही. मात्र त्या घरी परतल्या नव्हत्या रविवारी रात्री गावकऱ्यांना या सर्वांचे मृतदेह तलावात आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी चौघींचेही मृतदेह तलावाबाहेर काढले असून ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलीस पुढील तपास करत आहेत.
तीन मुलींसह आईचा मृतदेह आढळला तलावात
सांगलीच्या बिळूरमधील दुर्दैवी घटना; कारण अस्पष्ट

