महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पाण्यात वीज प्रवाहाचा धक्का लागून चार मुलांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बर्डे कुटूंबियांवर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून या कुटूंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे दिले.
तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथे एका छोट्याश्या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात पडलेल्या वीज तारेमुळे शॉक बसून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे येथे घटनास्थळी जात बर्डे कुटूंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मीरा शेटे, गणेश सुपेकर, सरपंच शिवाजी फणसे, नांदूरचे सरपंच जयवंत सुपेकर, सुनंदा भागवत, जयराम ढेरंगे, संपत आभाळे, गणेश लेंडे, विक्रम कजबे, दिनेश पावडे आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. तांबे म्हणाले,
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात लवकरच बर्डे कुटूंबियांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. आम्ही सर्वजण या कुटूंबियांसोबत आहोत. ज्यांनी या प्रकरणी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली आहे. या घटनेचा सखोल तपास व्हावा. दरवर्षी राज्यात अशा अनेक घटना घडतात, त्यामुळे वीज मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.



