महाराष्ट्र संवाद न्यूज
बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. जवळपास ८३ गावातील लाभार्थ्यांना या पाण्याचा लाभ मिळणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनीबाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली. खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते जास्तीचे मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सांगितले.
तसेच अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
“निळवंडे धरण आणि कालव्यांच्या प्रश्नावरुन तत्कालिन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असतांना खासदार सदाशिव लोखंडेदेखील या श्रेयवादाच्या लढाईत उतरले आहेत. मुंबईत लोखंडे यांच्या उपस्थित मुख्यमंत्र्यांनी निळवंडेच्या कामाचा आढावा घेतल्याने निळवंडे कालव्यातील पाणी ऐन दीपावलीच्या काळात राजकीयदृष्ट्या चांगलेच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुर्णत्वास गेलेले धरण आणि आता अंतिम टप्प्यात आलेले कालवे याचे खरे श्रेय कोणाकडे जाते हे सर्वांनाच माहिती असले तरी आता निळवंडेवरुन राजकीय बाण मारण्याची संधी कोणीच सोडणार नसल्याची चिन्हे आहेत”.

