महाराष्ट्र संवाद न्यूज
स्वामी समर्थ मंदीर ते साई मंदिरादरम्यान म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाची कॉग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पुल दुरुस्त करण्यासंदर्भात संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
भोजापुर धरण भरल्यानंतर म्हाळूंगी नदीला सातत्याने पाणी आहे. साईनगर, घोडेकरमळा या दोन भागांना जोडणारे म्हाळुंगी नदीवरील दोन्ही रस्ते बंद झाल्याने या भागातील नागरिकांना दुरच्या रस्त्याचा शहरात येण्यासाठी वापर करावा लागत आहे.
म्हाळुंगीला असलेल्या पाण्यामुळे दोन दिवसांपूर्वी हा पूल खचला. पुलावर असणाऱ्या आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनदेखील तुटल्याने नगरपरिषदेने त्याची दुरुस्ती तातडीने केली. मात्र खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने हा पुल पादचाऱ्यांसह सर्वच वाहनधारकांसाठी बंद करावा लागला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी शनिवारी या पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, बाळासाहेब पवार, नितीन अभंग, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, निखील पापडेजा, अंबादास आडेप, शेखर सोसे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
पाहणीदरम्यान काय झाले
घोडेकर मळा, साईनगर, गंगामाई घाट, ओहरा कॉलेज, साईमंदिर, पंपिग स्टेशन आदी भागातील नागरिकांसाठी हा पुल वर्दळीसाठी महत्वाचा असल्याने तो तातडीने दुरुस्त करण्याच्या सुचना संबधितांना देण्यात आल्या.
आणखी छायाचित्रे



