महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची सहकार क्षेत्रात लौकिकास्पद वाटचाल सुरू आहे. गतवर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप करत चांगला भाव दिला होता. यावर्षी देखील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे ऊस उत्पादक व कामगारांसाठीचे 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, रामहरी कातोरे, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, निळवंडे कालव्याच्या कामाला आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती दिली. दीपावली पाडव्याला कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. मात्र सरकार बदलामुळे आता या कामाची गती मंदावली आहे. असे असले तरी यापुढील काळात हे पाणी कोणीही थांबवू शकणार नाही. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सरकारने घोषणा करण्याऐवजी थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याची गरज आहे.
थोरात कारखान्याचा कारभार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वावर सुरू आहे. यामुळे देश पातळीवर कारखान्याचा वेळोवेळी गौरव झाला. दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176/- रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे बँकेत वर्ग केले जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रति टन 2626/- रुपये भाव मिळेल. त्यासाठीचे अतिरिक्त अनुदान 14 कोटी रुपये, ठेवीवरील व्याज दोन कोटी रुपये आणि कामगारांचा बोनस 10 कोटी रुपये असे 26 कोटी रुपये या निमित्ताने बाजारात येतील.
कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचेही भाषणे झाली. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
राजहंस दूध संघाकडून देखील एक रुपया रिबेट
ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणाऱ्या राजहंस दूध संघाने कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली. दूध संघाकडून सर्वाधिक 35 रुपये लिटर प्रमाणे भाव दिला जात असून 16 ऑक्टोंबर पासून हा भाव प्रति लिटर 36 रुपये करण्यात आला आहे. तसेच दिवाळीनिमित्त प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबेट देणार असल्याची घोषणा माजी मंत्री थोरात यांनी याच कार्यक्रमात केली.

