महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सहकारी साखर कारखाना चालविणे येड्या गबाळ्याचे काम नाही. कारखान्याने एखादे कर्ज पाच-सात वर्षात फेडणे अपेक्षित आहे. मात्र आख्खी पिढी गेली तरी कारखान्याच्या कर्जाचा बोजा कायम आहे. ऋण काढून सण साजरा करण्यासारखं कर्ज काढून भाव द्यायचा नसतो, असे सहकाराचे धडे देत जर संचालक मंडळाने माझ्या सूचना अमलात आणल्या नाही तर येथेच सभा घेऊन या संचालक मंडळाला निवडून दिल्याची चूक केल्याचे जाहीररित्या सांगेल, अशा कानपिचक्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या संचालक मंडळाला दिल्या.
अकोलेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडल्यानंतर 29 व्या ऊस गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड, उत्तर नगर शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे, अगस्तीचे अध्यक्ष सिताराम गायकर, उपाध्यक्ष अशोकराव भांगरे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, कॉ. कारभारी उगले, मधुकरराव नवले, डॉ. अजित नवले, विजय वाकचौरे, ज्येष्ठ संचालक कैलास वाकचौरे, मिनानाथ पांडे, परबतराव नाईकवाडी, अशोक आरोटे, अशोक देशमुख, रामनाथ वाकचौरे, यमाजी लहामटे, मच्छिंद्र धुमाळ, कैलास शेळके, पाटीलबा सावंत, विक्रम नवले, प्रदीप हासे, विकास शेटे, मनोज देशमुख, सचिन दराडे, बादशहा बोंबले, सुलोचना नवले, शांताबाई वाकचौरे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, अमित भांगरे, मारुती मेंगाळ, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, भाऊपाटील नवले, रमेश देशमुख, सुरेश गडाख, रामहरी तिकांडे, शरद देशमुख, सुशांत आरोटे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, साखर निर्यातीसाठी सरकारने कोठा पद्धत लागू करू नये तसेच साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीज दरामध्ये वाढ करण्याची गरज आहे. संचालकांनी येत्या काळात कारखान्यात काटकसरीने काम करुन कारखाना कर्जमुक्त करत शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा. वयाच्या 24 व्या वर्षापासून मी कारखानदारीचा अनुभव घेत आहे. 2009 च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सरकारने सहकारी साखर कारखान्याना भाग भागवल न देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहू शकले नाहीत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला साखर कारखाना उभारला तेव्हा पासून सहकार हळूहळू वाढु लागला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बहुतांश मंत्री सहकारात काम करणारे असल्याने कारखान्यांना मदतीचे धोरण सरकारने हाती घेतले होते.
आता साखर कारखानदारीत स्पर्धा वाढत आहे. प्रतिदिन साडेतीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या अगस्तीचा कर्मचाऱ्यांच्या पगारावर पंचवीस कोटीहून अधिक खर्च होतो असे सांगत त्यांनी सहकारातील खर्चाचा ताळेबंद मांडला. याशिवाय या कारखान्याच्या कामकाजात अनेक त्रुटी असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे सांगितले. ऊस उत्पादक सभासदांना योग्य भाव द्यायचा असेल तर कारखान्याने अन्य प्रकल्प देखील हाती घेतले पाहिजे असे सांगत त्यांनी नव्या संचालक मंडळाला सहकाराचे धडे दिले.
कारखान्याचे अध्यक्ष गायकर म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा बँकेच्या सहकार्यातून अगस्ती कारखाना बंद पडू दिला जाणार नाही. हा कारखाना आम्ही सक्षमपणे चालून दाखवू. कारखाना निर्मितीपासून कार्यक्षेत्रात पाच ते सहा लाख मेट्रिक टनापुढे ऊस निर्मिती होऊ शकली नाही. बाहेरून ऊस आणून कारखाना चालवावा लागला आहे. इतर कारखान्यांशी स्पर्धा करताना यावर्षी इथेनॉलमधून नफा मिळेल. तसेच खर्च कमी करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस म्हणून देण्यात आला असून ऊस उत्पादकांना एफआरपी पेमेंटपोटी आठ कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहेत.
प्रास्ताविक उपाध्यक्ष अशोक भांगरे यांनी केले. मधुकरराव नवले, डॉ. अजित नवले, कॉ. आर. डी. चाैधरी, दादापाटील वाकचौरे आदींची भाषणे झाली.
कारखाना निवडणुकीपुर्वी विरोधकांनी मुळा, आढळा पाणी पेटवण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. कारखान्याला येण्यासाठीचे रस्ते कसे आहेत तेही सांगायला नको. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या रस्त्यांसाठी 20 कोटीचा निधी दिला मात्र त्यासाठी आवश्यक एनओसी नगरपंचायतीने दिली नाही म्हणून त्यातील दहा कोटी रुपयांचा निधी परत गेला. येथे कोणतेही काम होऊ द्यावयाचे नाही ही माजी आमदाराची भूमिका आहे. आता सभासदांनी कारखाना ताब्यात दिला आहे तर कारखान्यावरील कर्ज कमी करून चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल.
डॉ. किरण लहामटे, आमदार

