महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
प्लास्टिक बंदी आदेश धुडकावत या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विक्रेत्यांना केले आहे.
प्लास्टिक बंदी आदेशाची शहरातील विक्रेत्यांकडून पायमल्ली सुरू होती बंदी असलेले प्लास्टिक पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहराच्या विविध भागात दोन दिवस ही कारवाई केली. दरम्यान काही प्लास्टिक विक्रेत्यांना कारवाईचा सुगावा लागल्याने त्यांनी बंदी असलेले त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या तातडीने गायब केल्या.
प्रशासक डॉ. मंगरुळे आणि मुख्याधिकारी वाघ यांनी पथकाला बंदी असलेले प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पथकाने एकाच वेळी तब्बल अर्ध्या लाखाचा दंड वसूल करत 100 किलो प्लास्टिक जप्त करण्याची कारवाई केली.
सध्या संगमनेर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम कामकाजावर दिसत आहे. मुख्याधिकारी वाघ यांनी पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्लास्टिक विरोधी पथक तयार केले आहे या पथकामध्ये आरोग्य विभागाचे अश्विन पुंड, अरविंद गुजर, चंद्रकांत ढोले, जयराम मंडलिक, अजय जेधे, मनोज जेधे, सतीश बुरुंगले, संजय जेधे आदींचा सहभाग आहे.
पथकाने संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, बस स्थानक परिसर, नवीन नगर रोड या भागातील प्लास्टिक विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली. या तपासणीमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक साहित्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. कारवाईत पथकाने प्लास्टिक विक्रेत्यांकडून तब्बल 45 हजार रुपयांचा दंड वसूल करत 100 किलो प्लास्टिक ही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली.
संगमनेर नगर परिषदेने यापूर्वीच प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असून काही व्यावसायिक ग्राहकांना विक्री केलेले साहित्य ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देतात. त्यानंतर ग्राहक वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या इतरत्र फेकून देतात. सदरच्या प्लास्टिक पिशव्या नाल्यामध्ये पडल्यामुळे नाले तुंबतात त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. तसेच सदरचे प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्यामुळे प्रसंगी त्यांना आपला प्राणही गमवावा लागतो. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते पर्यावरणाला घातक ठरते. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशवी न वापरता कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करावा.
डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रशासक
राहुल वाघ, मुख्याधिकारी.


