महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत शिवसेना विरोधात अंधेरी पूर्व मध्ये पोट निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. भाजपने त्यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर आता ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ठाकरे यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपले अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे ठाकरे यांच्या पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा राज्यात सुरू होती.
आता ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ठाकरे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी म्हटले आहे की, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा.
नेमके काय म्हणाले राज ठाकरे आपल्या पत्रात…
प्रति,
सन्मा. श्री. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
सस्नेह जय महाराष्ट्र !
महोदय,
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. ‘सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा’.
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देत पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच अपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्ध पातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसेच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.
दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरीही दिवाळी धुमधडाक्यात साजरा करण्याच्या मनस्थितीत असणार, अशावेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल, ह्याकडे राज्य सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावं ही नम्र विनंती.
आपला नम्र
राज ठाकरे

