महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सांत्वनपर भेटीच्या चढाओढीनंतर अखेरीस संगमनेर तालुक्यातील त्या विजेच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार भावंडांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले.
राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळच्या वांदरकडा येथे वीजवाहक तार पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. या मृत मुलांच्या वारसांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने किराणा साहित्य देण्यात आले. या कुटूबीयांकरिता घरकुलांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून आठ दिवसात मंजूरीचे पत्र देण्यात येईल, अशा आश्वासन यावेळी देण्यात आले.
घटनेच्या दिवशीच पालकमंत्री विखे पाटील यांनी या कुटूबीयांची भेट घेवून त्यांना सर्वेतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्र्यांनी विखे पाटील यांच्या भेटीनंतर मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
निष्काळजीपणा करणाऱ्या वायरमन आणि गावातील दोघा शेतकऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चारही मुलांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्यावतीने तसेच अन्य विभागाकडून मदत मिळावी, म्हणून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्तिगत पाठपुरावा केला होता.
वीज वितरण कंपनीने मंजूर केलेले प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश या कुटुंबांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते अकलापूर येथे देण्यात आले. अन्य योजनेतील धनादेशही लवकरच या कुटुंबाला दिले जातील. शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’चे कीट ही या कुटुंबीयांना देण्यात आले.
यावेळी संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, वीज वितरण कंपनीचे अभियंता थोरात यांच्यासह बापुसाहेब गुळवे, ॲड. श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, डाॅ. सोमनाथ कानवडे, सतिष कानवडे, अमोल खताळ, किशोर डोके, जनार्दन आहेर, राहूल भोईर, संजय देशमुख, साहेबराव वलवे उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. परंतू, या कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. सरकार संवेदनशील असल्यामुळेच मदतीचे धनादेश तातडीने दिले गेले. अन्य मदत मिळण्यासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करणार असून घरकुलांचे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

