महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे केला आहे. यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सरकार या संदर्भात गांभीर्याने विचार करत नसल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच या निर्णयाचा निषेध म्हणून संगमनेरच्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दीपावलीच्या पार्श्वभूमीवर टपालाने काळा आकाश कंदील पाठविण्यात आला. छात्रभारतीच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.
छात्र भारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सदस्य तुषार पानसरे, जिल्हाध्यक्ष राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, राधेश्याम थिटमें आदींनी हा आकाश कंदील पाठविला आहे.

