महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमनर, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री विखे यांना माहिती दिली.
विखे म्हणाले, सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस ऑक्टोंबरमध्ये झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली असली तरी शेवगांव, जामखेड, राहुरी, नेवासा, कोपरगांव या तालुक्यात सर्वाधीक्ष क्षेत्र बाधीत झाले आहे.
सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाले असून प्रशासनाने सरसकट १०० टक्के पंचनामे करावेत. दीपावली दरम्यान आपण स्वत: काही तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची भेट देवून पाहणी करणार आहोत.
लंम्पी चर्मरोगामुळे पशुधनाचा मृत्यूदर वाढत आहे. त्या संदर्भात सर्व तहसिलदारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लंम्पी लसीकरण आणि उपलब्ध औषध साठा याचा आढावा घेवून उपाय योजना केल्या जाव्यात, अशा सुचना मंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या किट वाटपाचाही आढावा घेतला. जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ६८५ किट प्राप्त आहेत. हे कीट दिवाळीपूर्वी गोरगरीब लाभार्थ्यांपर्यत पोहोचले पाहिजेत, यासाठी सुसूत्रता आणत प्रभावी काम करण्याच्या सुचना मंत्री विखे यांनी दिल्या.

