मुंबई । प्रविण पुरो
(लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत)
प्रिय पवार साहेब,
गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे.
विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत यांच्यावर कारण नसताना लादलेली ईडी कारवाई, त्यानंतर आपण निर्माण केलेल्या महाविकास आघाडीच्या बदनामीची मोहीम, ते सरकार पाडण्यासाठी सीबीआय, ईडीचा झालेल्या बेमालूम हस्तक्षेपाची जाणीव आपल्याला असेल. ज्यांच्यावर इडी, सीबीआयची ही कारवाई झाली, ज्यांनी महाविकास आघाडीची सत्ता पाडली त्यात आपल्या कार्यकर्त्यांकडून पहिलं नाव हे देवेंद्र फडणवीसांचं घेतलं जातं. आपणही हे समजून असाल. असं असताना एमसीएसारख्या राज्य सत्तेच्या तुलनेत फालतू असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही याच फडणवीसांना जवळ करता, त्यांना मांडीवर घेता, त्यांच्याबरोबर जेवणावळी करता हे नाही पटलं साहेब.
साहेब, फडणवीस यांना जवळ करण्याचे परिणाम जाणता? आमच्या नेत्यांविरोधी खोटेनाटे आरोप करणाऱ्यांचा घो करणारे आम्ही तुमच्यासाठीच त्यांच्या कार्यकर्त्यांना अंगावर घेतो, त्यांच्या पोलीस केसेस झेलतो. आणि तुम्ही खेळात राजकारण नको म्हणून त्यांना खांद्यावर घेता? हे नाही पटत पवार साहेब. तुमचं मन मोठं आहे. पण ते या मोठ्या मनाचे नाहीत. ते तुमच्या खांद्यावर बसून नको ते चाळे करताहेत, तुमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, हे तुमच्या अजूनही लक्षात कसं येत नाही? मोठ्या नेत्याने त्याच तुलनेचं राजकारण करावं, असं तुम्हीच कार्यकर्त्यांना सांगता आणि फडणवीस, शेलार यांच्यासारख्या आतल्या गाठीच्या, सत्तापिपासू, कुपमंडळू नेत्यांशी गुलूगुलू करता, त्यांच्यासोबत जेवता, उठता बसता हे आम्हा कार्यकर्त्यांना कसं बरं पचेल?
2019च्या निवडणुकीतील फडणवीस आणि त्यांच्या कंपुने पटावर चालवलेली उंटाची चाल साहेब तुम्हाला आठवते? तेव्हा विरोधी पक्षांच्या एकूण एक नेत्यांविरोधी चौकशांचा ससेमिरा सुरू होता. आज हसन मुश्रिफ तर उद्या अजित पवार यांच्याविरोधात कारवाईचे बार फुटत होते. किरीट सोमय्यांच्या जिभेला हाड राहिलं नव्हतं. याच दरम्यान प्रचारात आपण गाठलेल्या उंचीने भाजपचे नेते चांगलेच हादरले होते. मुश्रिफ, पवार हे न पुरणारे प्यादे होते हे लक्षात आल्यावर त्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याची जबाबदारी आपल्यावर टाकत ईडीने आपल्याला नोटीस बजावली आणि आमच्या सारखे तळागळातले कार्यकर्ते अक्षरश: हैराण झालो. ईडीला धडा शिकवण्याच्या इराद्याने मुंबईत यायचा आमचा बेत तुम्हीच टाळायला लावलात. तेव्हा तुमच्या नेतृत्व कौशल्याची जाणीव साऱ्या महाराष्ट्राला झाली.
त्या दरम्यान याच फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती ठावूक आहे? कर नाही तर डर कशाला, हा डायलॉग फेकत त्यांनी तुमच्यावर अविश्वास दर्शवला. या कारवाईच्या मागे कोण आहे, हे तुम्ही तेव्हाच जाहीर करून टाकलंत आणि फडणवीस तोंडावर पडले. ही कारवाई योग्य असती तर प्रचारात टोक गाठलेल्या भाजपला रोखणं कदापि शक्य नव्हतं. या कारवाया जाणीवपूर्वक होत असल्याचा राग जनतेने व्यक्त केला आणि भर पावसात त्यांनी तुमच्या सभांना दाद दिली. सहकारी काँग्रेस मिळून 50-55 जागा तरी येतील काय अशी परिस्थिती असताना तुम्ही 100 चा पल्ला गाठून दिलात हे आम्ही सारे जाणून आहोत. भाजप नावाचा पक्ष हा देशातील सर्वांनाच अंर्तमूख करणारा विषय बनला आहे.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील भाजप आज राहिलेला नाही. त्याने आज बकासुराचं रूप घेतलं आहे. सत्तेसाठी तो पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आपल्यालाही ठावूक आहे. पाठीवर हात फिरवणाऱ्यांचाही तो विचार करू शकत नाही. शिवसेनेच्या आज झालेल्या अवस्थेवरून हे लक्षात यायला हरकत नाही. ज्यांचा हात धरून मार्ग धरला त्यालाच संपवण्याचा अवसान घातकीपणा जो पक्ष करतो तो तुमचाही होऊ शकत नाही, हे पवार साहेब आम्ही काय सांगावं? भाजपची हीच खेळी पाहून हयातभर दोष दिला त्या सेनेने तुमच्या शब्दाला मान देऊन राज्यात आपली सत्ता आणली. यावरून ते भाजपला किती कंटाळले होते हे लक्षात येते.
हीच सत्ता उलथवण्यासाठी फडणवीस कंपूने स्वीकारलेला फोडा-तोडा मार्ग साहेब तुम्ही विसरला कसे? राज्यातल्या सत्तेहून एमसीए महत्वाची आहे काय? खेळाच्या मैदानात राजकारण नको, असं सांगण्याचा अधिकार खेळ खेळणाऱ्या खेळाडूचा आहे. ज्यांना त्यातलं काही कळत नाही त्यांनी त्यात घुसखोरी करायची याला राजकारण नाही तर काय म्हणायचं? खेळाच्या मैदानावर वावरण्याचा अधिकार संदीप पाटील यांचा की नागपूरच्या पालिकेतील कंत्राटदार असलेले अमोल काळे यांचा? शेंबडं पोरही संदीप पाटील यांचं नाव घेईल. जे तुम्हाला अयोग्य वाटलं. यात काही वावगं निश्चीतच होतं. खेळ म्हणून तुम्ही ज्याला महत्व देता त्या खेळात काळेंसारख्यांना उतरवून आपण खेळाशीच उपमर्द केलाय, अशी आमच्यासारख्यांची भावना आहे. आणि हे काळे कोण तर ते फडणवीसांचे चेले. या काळे यांचा खेळाशी अर्थाअर्थी संबंध नाही.
नागपूरचे महापौर असल्यापासून फडणवीसांचा त्यांच्यावर अशीर्वाद आहे. यामुळे ते फडणवीसांचे निस्सीम भक्त. राज्याच्या राजकारणात उठसूठ साठमारी करणाऱ्या फडणवीसांनी एखाद्या खेळाडूचं समर्थन केलं आणि तुम्ही त्यांची पाठराखण केली असती तर एखादवेळी तेही समजू शकलं असतं. पण फडणवीस-शेलार सांगतात म्हणून काळेंची बाजू घेण्याइतके साहेब आपण स्वस्त कसे होता? खेळाच्या मैदानात आलेलं हे राजकारण अभद्र युतीचं आहे, अशी टीका होते आहे. या टीकेला आम्ही काय उत्तरं द्यायची तेही सांगा.
आपल्या सोबत शिवसेना सत्तेत बसल्याचे परिणाम आपण पाहातच आहोत. या कडवट पक्षाची आज महाराष्ट्राला आवश्यकता आहे, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. अशा पक्षाला संपवण्याचं भाजप आणि फडणवीस कंपूने केलेलं कारस्थान केवळ सेना संपण्यापुरतं मर्यादित नाही. ताकदवान नेत्यांना फोडून राज्यातल्या राजकीय पटलावरून तुम्हाला नेस्तनाबुत करण्याचे हरएक प्रयत्न झाले. आता तर ते आपल्या बारामतीतही पोहोचण्याची भाषा करत आहेत. बारामती म्हणजे कोणाला आंदण दिलेली नाही, असं फडणवीस, बावनकुळे बेधडक बोलतात तेव्हा आम्हालाही राहवत नाही. प्रादेशिक पक्ष ही संकल्पना भाजपला मान्य नाही. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तसं जाहीर केलंय. यावरून त्या पक्षाचे आणि त्या पक्षातील नेत्यांचे मनसुबे साहेब लक्षात घ्या. सत्ता हस्तगत करण्यासाठी फडणवीस कंपूने गाठलेली पातळी, खोट्या गुन्ह्यात गृहमंत्री असलेल्या अनील देशमूख, नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई हे पक्षासाठी चांगलं लक्षण नाही. पक्ष संपवण्याचं ते एक क्रूर कारस्थान आहे.
पक्षासाठी हे नेते गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांचे कार्यकर्ते आणि नातलगांवर आपल्या या कृतीचे काय परिणाम होत असतील, याचा एकदा साहेब विचार करा. जो सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर येऊन भाजपच्या या कुटील नीतीचा विरोध करतो, त्या कार्यकर्त्याच्या मनातील भावना आपण समजून कधी घेणार साहेब? सत्ता मिळवण्यासाठी कष्टाचं रान केलं त्या खासदार संजय राऊत यांना या कंपूचं पाताळयंत्री कारस्थान केव्हाच कळलं होतं. यामुळेच ते महाविकास आघाडीचे निर्माते बनले होते. मलिक आणि राऊत यांच्यामुळेच भाजपचे नेते नागडे पडत होते. या दोन नेत्यांची तोंडं बंद करण्यासाठी ईडीची कारवाई करवणारे तुमच्या मांडीला मांडी लावून जेवण करताना पाहून आम्हा कार्यकर्त्यांना काय वाटत असेल? ज्यांना सोबत घेऊन हा प्रपंच घडवलात ते अशिष शेलार यांची उध्दव ठाकरेंचा बाप काढण्याइतपत मजल गेली होती. विषयही तुम्ही लावून धरलेल्या एनआरसीचा होता. गोव्यात काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी ते रसद घेऊन होते त्यांचेच तुम्ही समर्थक हे पटत नाही साहेब.
आणि हो, आमचे बंटी आव्हाड.. पवार साहेबांचं वय, त्यांच्या राजकारणाची उंची पाहून कदाचित त्यांच्याकडून असल्या घटना घडत असतील. पण बंटीजी आपण तर पक्षाचे हार्डकोर आहात. सामान्य कार्यकर्त्याच्या व्यथा तुम्ही जाणता. भाजप आणि त्यांच्या फडणवीस-शेलार गँगने राज्याच्या राजकारणात केलेले उपद्व्याप तुम्ही जवळून पाहिले आहात. नव्हे तुम्ही या उपद्व्यापाचे शिकार झाला होतात. तुमच्यावर हल्ले करण्यासाठी सोडलेली संघीय पिळावळ तुम्ही विसरलात? या गँगचे पाठीराखे कोण हे कळूनही आपण या युतीत सहभागी झालात याचं दुर्देवं वाटतं. आठवते गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाचा सोहळा? या सोहळ्याच्या व्यासपीठावर भाजप वगळता सर्वपक्षीय नेते होते. खूप बरं वाटलं. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांना असे धडे देणं आवश्यक आहे. कारण जवळ घेण्याच्या लायकीचे ते राहिलेले नाहीत. तेव्हा पक्ष वाढवायचाय की तो भाजपचरणी विलिन करायचाय ते एकदा सांगून टाका म्हणजे आम्ही मोकळे…


