महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अस्मानी संकट आल्यावर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. मात्र आपल्याकडील निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
शिवसेना फुटीनंतर रविवारी प्रथमतःच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि बांधावरच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
आपल्या दौऱ्यात ठाकरे यांनी दहेगाव आणि पेंढापूर येथे जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे. आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेल, या निर्दयी सरकारकडे भावनांचा देखील दुष्काळ आहे.
कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ अशा दोन प्रकारच्या दुष्काळांचा शेतकऱ्याला सामना करावा लागतो. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते.
एका बाजूला दिवाळी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळी निघाले आहे. दिवाळी साजरी करणे तर दूरच पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिजवायचे असा मोठा प्रश्न अन्नदात्याला पडला आहे.
मी विरोधी पक्षात आहे म्हणून मुद्दाम येथे आलेलो नाही. शेतकऱ्याचे मोठे ऋण आपल्यावर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली. सर्वत्र लॉकडाऊन असताना आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचे काम त्यावेळी शेतकऱ्यांनी केले. त्यावेळी शेतकरी आपल्या शेतामध्ये राबला नसता तर आपल्या आर्थिक परिस्थितीचे सुद्धा दिवाळी निघाले असते.
50 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी आहे. नुकसानीचे पंचनामे होतील तेव्हा होतील ,आधी ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, असे ठाकरे म्हणाले.

