महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दोन आमदारांमधील वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आधी मंत्रिमंडळाचा रखडलेला शपथविधी, आता बहुचर्चित रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी समोर आलेली नव्हती.
मात्र आता गुवाहाटी वरून झालेल्या आरोपामुळे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.
रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष आमची राजकीय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याचे उत्तर दिले पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
शिवाय या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील नोटीस पाठविणार असून ‘तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा’, अशी मागणी या नोटीसद्वारे करणार आहे. राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासेन असे देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान सरकारमधील या दोघा आमदारांमधील वादामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. गुवाहाटी प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे याप्रकरणी काय म्हणतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

