महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, या वर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जास्तीच्या पावसामुळे पिके वाया गेली. अशा संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची आवश्यकता असते.
त्यांना मदत द्यायला हवी मात्र सध्याच्या सरकारकडून वृत्तपत्र, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. काही लोक दौरे करून फक्त प्रसिद्धीसाठी फोटो टाकतात मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही.
पिकविमा कंपन्या नफेखोरी करतात. नफा मिळविण्यासाठी या कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. हा अन्याय टाळण्यासाठी आणि शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी आमच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने “बीड पॅटर्न” तयार केला होता. त्याला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही.
या पॅटर्नवर काय अंमलबजावणी होते हे भविष्यात कळेलच. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. तरीदेखील त्यांनी दौरे केले. अनेक दौऱ्यात आम्हीदेखील सहभागी झालो होतो. त्यामुळे त्यांनी दौरे केले नाही हे म्हणणे म्हणजे केवळ राजकारण आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या यात्रेबद्दल थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी…
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा ही लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी आहे. या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून यात्रेला कोणत्याही पक्षांचे बंधन नाही. देशात लोकशाहीचे, बंधूभावाचे व खुले वातावरण राहावे यासाठी लोकशाहीच्या विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्व पक्ष संघटना यामध्ये सहभागी होत असून ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्वक स्वागत होईल.


