महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांबाबत शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासन स्तरावर निर्णय घेणार असून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खर्ड्याच्या सिताराम गड मध्ये आयोजित आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत कर्जत-जामखेडचे आमदार माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. विखे पाटील यांनी खर्डा परिसराश मोहरी तेलंगशी जायभाय वाडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पाहणी केली. बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
विखे म्हणाले, ऑनलाइन पीक विमा साठी नोंदणी करताना अडचणी येत असल्याने ऑफलाइन पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांचा खाजगी विमा कंपन्यावर रोष आहे, शेतकऱ्यांकडून पिक विमासाठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते, त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ६५ मिलीमीटर पावसाची अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फायदा मिळत नाही, त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत त्या शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे.
शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खाजगी विमा कंपनीला ७२ तासाच्या आत कळविण्याची अट शिथिल करण्याची गरज आहे, शेतकऱ्यांची हीच मागणी आहे. यासाठी कृषीमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. सरकार शेतकऱ्यांचे आहे, पैसा शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांना जाचक अटी घालून चालणार नाही. त्यासाठी विमा कंपन्यांना शेतकरी हिताच्या अटी घालून शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनातर्फे गोरगरिबांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. केशव तुंबारे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुलदीप चौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार राम शिंदे म्हणाले,
अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जाव्यात. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी.

