महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.
त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दाखल केलेल्या अकरा लाख प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात नसल्याचे कारण पुढे करत आयोगाने अवैध ठरविले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अडचणीत आणण्यासाठी राजकीय दबावाचा कितीही वापर झाला तरी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना असून येत्या काळात हे सर्व राज्यासमोर येणार आहे असा विश्वास शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे.
ठाकरेंची साडेसाती संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र ठरविले अवैध
विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र नसल्याचे कारण केले पुढे

