महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना केंद्राच्या २८५ मिडीयम रेजिमेंटचे लान्सनायक आणि नाशिकचे भूमिपुत्र संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसाममध्ये वीरमरण आले आहे. सर्वत्र दीपावलीचा सण उत्साहात व आनंदात साजरा होत असताना गायकवाड कुटुंबीयांसह नाशिकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात रात्री बारा वाजेपर्यंत येण्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे.
शहीद गायकवाड यांच्या लहवित गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वीरमरण आलेले गायकवाड सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यात लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानक मेंदूमध्ये त्रास झाला. त्यांना रेजिमेंट कडून तात्काळ कोलकत्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती परंतु दुर्दैवाने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निवृत्तीसाठी दहा महिन्याचा कार्यकाल शिल्लक असतानाच हे दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुले, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

