महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल हे सर्वप्रथम गुवाहाटीला गेले होते. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो. तेथे मी शिंदे गटासोबत आहे एवढे त्यांच्याशी बोलून परत यायचं होतं, असे ठरले होते. खरंतर मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. राजकारणात ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
आमदार कडू एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कडू यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील, उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके ते ‘वर्षा’वर दिसत नव्हते.
सध्या रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या सगळ्यामुळे बच्चू कडू यांनी वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे वक्तव्य राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. दरम्यान कडू रविवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
बच्चू कडूंची राणांवर टीका
शनिवारी यवतामळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. धर्म हा कधीच धोक्यात नसतो, नेता धोक्यात असतो. राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा आंदोलन म्हणजे फुकटच्या प्रसिद्धीचा बुडबुडा होता. त्यांनाही हनुमान चालिसाही म्हणता येत नाही आणि ते आंदोलन करायला निघाले. रवी राणा हे वाढदिवसाच्या बॅनर्सवर अमिताभ बच्चनच्या स्टाईलध्ये फोटो टाकतात,अशी टीका कडू यांनी केली.



