महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नेत्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, काही हरकत नाही. आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला आहे. जनता आमचे रक्षण करेल, असे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
पुढील महिन्यात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ राज्यात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेगावमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारणाच्या घसरत्या पातळी बद्दल खंत बोलून दाखवत राज्य सरकारवर हल्ला चढविला.
राज्य सरकारने बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी राज्यातील पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली यावर त्यांना छेडले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादा संदर्भात बोलताना ते म्हणाले, आत्तापर्यंत मी आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. माझी चाळीस वर्षे राजकारणात गेली. मात्र सध्या ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांची वक्तव्य सुरू आहे ती बघता राजकारणाची पातळी खूप खाली गेली आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ लवकरच महाराष्ट्रामध्ये येत असून या यात्रेतील राहुल गांधींची शेवटची सभा शेगावमध्ये होणार आहे. यावेळी ते गजानन महाराजांचे दर्शन देखील घेणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान फक्त गुजरातच्या विकासासाठी…
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान हे फक्त गुजरातच्या विकासासाठी आखण्यात आले होते राज्यातील रोजगार गुजरातला नेता यावे यासाठी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे हे सरकार केवळ गुजरात साठी काम करत असल्याची टीका राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.



महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान फक्त गुजरातच्या विकासासाठी…