महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नूतनीकरण करत पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेला गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील केबल सस्पेन्शन ब्रिज कोसळल्याने आतापर्यंत साठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी पुलावरून ये-जा करणारे सुमारे चारशे लोक नदीपात्रात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतामध्ये दहाहून अधिक बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर जवळपास शंभरहून अधिक लोकांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
गुजरात सरकारमधील मंत्री ब्रजेश मेरजा घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल देखील घटनास्थळी भेट देण्यास निघाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या या पुलाचे दोन कोटी रुपये खर्च करून नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी या पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
त्यानंतर अवघ्या पाचच दिवसात ही दुर्घटना घडली आहे. शंभर लोकांचे क्षमता असलेल्या या पुलावर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पाचशे लोक असल्याचे सांगितले जाते.
पुल कोसळल्यामुळे ज्या ठिकाणी लोक पाण्यात पडले तेथे पंधरा फूट खोलवर पाणी होते.

