विद्याचंद्र सातपुते
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या तरुण शेतकऱ्याने शेतीतील वेगळी वाट शोधत फुलशेतीकडे आपला मोर्चा वळवला. 
या कामी त्यांना आई हिराबाई, बंधू सचिन यांची साथ लाभली. चालू हंगामात त्यांनी शेवंती या फुल शेतीचे नियोजन केले होते. सेंट व्हाईट या वाणाची निवड त्यांनी या हंगामात केली. या जातीचे फुले आकाराने मोठी व मध्यभागी आकर्षक पिवळ्या रंगाचा ठिपका असल्याने या फुलांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ५ जून रोजी सुमारे अडीच हजार रोपे त्यांनी ठिबक सिंचन करून लागवड केली.
सुमारे १७ गुंठे क्षेत्रावर फुलांची लागवड करण्यात आली होती. डोंगर उताराला असलेल्या शेतीवर ही लागवड करण्यात आली. उत्तम निचऱ्याची व मध्यम प्रतीची जमीन या पिकासाठी मानवते हा त्यांचा अनुभव होता. सुरुवातीला ठिबक संपूर्ण शेतात पसरून देण्यात आली. दोन ओळीतील अंतर सहा फूट तर दोन रोपांतील अंतर सव्वा फूट ठेवले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी हे अंतर योग्य असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 
ड्रीपद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन त्यांनी शेवंती पिकासाठी केले होते. योग्य वेळी केलेली लागवड व वेळोवेळी केलेली मशागत यामुळे पिकाची वाढ समतोल पद्धतीने झाली. चालू हंगामात दसरा या महत्त्वपूर्ण सणासाठी सुमारे पाच क्विंटल फुले बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आले. दसरा सणाला सरासरी २५० रुपये प्रति किलो भाव या फुलांना मिळाला.
दिवाळी सणासाठी राखून ठेवलेली फुले सुमारे १५ क्विंटल विक्रीसाठी बाजारात पाठवण्यात आली. या फुलांना सरासरी १०० रुपये प्रति किलो बाजार भाव मिळाला आहे. आतापर्यंत २ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न झाले. 
सुमारे ५ क्विंटल फुले अजून बाजारात पाठवणे बाकी आहे. एकूण खर्च वजा जाता तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न होणार आहे. शेतीचे नीटपणे केलेले नियोजन आणि साधलेली वेळ यामुळे फुल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवता येते हे नितीन साठे या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
” शेतकऱ्यांनी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हवामान बदलाच्या या संकटातून वाचता येईल”.
– नितीन साठे, फुल उत्पादक शेतकरी.

