महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी आपला आरोप मागे घेतला तर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे बच्चू कडू यांची वेगळीच भूमिका समोर आली असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या घटक पक्षांमधील दोघा आमदारांमधील वाद ५० खोक्यांच्या आरोपावरून विकोपाला गेला होता. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या या वादात ऐनवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत मध्यस्थी केली. राणा आणि कडू या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलाविले होते.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या तीन-साडेतीन तासांच्या चर्चेनंतर आमदार राणा यांनी आम्ही दोघेही सरकार सोबत असल्याचे सांगितले. राणा यांनी बोलता बोलता तोंडातून निघालेले शब्द मागे घेत असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. विचारातील मतभेदांमुळे तोंडातून असे शब्द निघाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांच्याही तोंडातून काही अपशब्द निघाले होते त्यामुळे हा वाद वाढत गेला.
राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी बच्चू कडू यांचा वेगळाच सूर दिसत आहे. त्यांनी वादावर स्पष्टपणे न बोलता आज कार्यकर्त्यांशी चर्चा आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून भूमिका जाहीर करू. यामुळे बच्चू कडू आता काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळं. मी त्यांचे आभार मानतो. पण आपल्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबत आज संध्याकाळी ६ वाजता बैठक घेणार आहे. नंतर पुढील निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
‘वाद रवी राणांमुळे सुरू झाला, माझ्यामुळे नाही’ वाद व्हायला नको होता. आरोपांना सुरुवात रवी राणांनीच केली. त्यामुळे वादाला तोंड फुटलं. मी वाद केलाच नाही. पण आरोप झाल्यानंतर गप्प राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केलं असतं. त्यामुळे आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानं वाईट किंवा चुकीचं केलं असं मला वाटत नाही. 
जे काही असेल या वादात आम्ही आयुष्य घालवणार नाही. व्यक्तीगत आरोपांमध्ये शक्ती वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक कामासाठी शक्ती लावण्याचा प्रयत्न करू, असं कडू म्हणाले.

