महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टारसह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच त्यांनी बलिदान दिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी केले आहे.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित स्व. इंदिरा व सरदार पटेल यांना अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सौ. ललिताताई सबनीस, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची पायाभरणी त्यांनी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचा विसर म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. हरितक्रांती, विज्ञान क्रांती घडवणाऱ्या इंदिराजींनी बँकांच्या राष्ट्रीयकरणासह बांगलादेशची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर नेत्या म्हणून त्या गौरविल्या गेल्या. व्यक्तिगत जीवनातही अनेक संकटांना झेलत त्या पुढे आल्या. इंदिराजींचे स्मरण हे फक्त काँग्रेसने नव्हे तर संपूर्ण देशाने केले पाहिजे. 
तसेच ६०० संस्थाने देशात विलीनीकरणाचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. इंदिराजी व सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक आहे. मात्र सध्या दुर्दैवाने देशात धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. लोकशाही ही धार्मिकतेवर आधारित नसून सर्वधर्मसमभावावर आधारित आहे. धार्मिकतेचे राजकारण हे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे आहे.
राष्ट्रीय पुरुष आणि देशाप्रती निष्ठा बाळगणारे स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी पक्षाप्रती कायम निष्ठा जपली असून या राष्ट्रपुरुषांचे विचार जपण्यासाठी निर्माण केलेली शक्तीस्थळे ही सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. रामदास वाघ यांनी आभार मानले.
खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भारतीयांची मने जोडणारी
काँग्रेसला मोठी परंपरा असून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान दिले. खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लोकशाहीचा विचार व भारतीयांचे मने जोडणारी यात्रा आहे. या यात्रेचे राज्यातील नियोजन हे काँग्रेस नेते आमदार थोरातांवर असून त्यांच्या नेतृत्वाखाली इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असून लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या संघटना, पक्ष सहभागी होणार असल्याचा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला.

थोरस्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जीवनात इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांना आदर्श मानले. त्यांच्या प्रती कृतज्ञता असावी आणि त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून अमृत उद्योग समूहात त्यांचे स्मारक उभे केले आहे. दिल्लीनंतर संगमनेरमध्ये हे शक्तिस्थळ कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत असते. समाजमनाच्या विकासाचा विचार मांडणाऱ्या इंदिराजींना शतकातील सर्वात कणखर नेतृत्व म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले गेले.
डॉ. सुधीर तांबे, आमदार.


