महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. शेतकरी आणि कारखाना प्रश्नांवर अनेकदा न्यायालयात धाव घेतली मात्र आता न्यायव्यवस्था, सरकारवर विश्वास राहिलेला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले.
शेट्टी यांच्या उपस्थितीत मांडवे खुर्द येथे झालेल्या ऊस परिषद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, उद्योजक किरण वाबळे, प्रगतशील शेतकरी कारभारी आहेर, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शेतकरी नेते जगदीश गागरे, अशोक खेमनर, प्रा. जालिंदर पाटील, सीताराम देठे, बाळशिराम पायमोडे, भूमीपुत्र संघटनेचे प्रवक्ते राजु रोकडे, जिल्हाध्यक्ष अमोल उगले, सरपंच सोमनाथ आहेर, भाऊसाहेब टेकुडे, शरद पवळे, विशाल करजुले, स्वप्निल झावरे, अमोल रोकडे, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, सुदामराव शिर्के यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 
शेट्टी म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १०१ सहकारी साखर कारखाने असून ९९ खाजगी कारखाने चालू आहेत. परंतु सहकारी साखर कारखाने राजकारण्यांच्या हातात आहेत. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल देशाची संकल्पना राबवत असताना साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन होत नाहीत. त्यामुळे या चोरीला सरकारचा आर्शिवाद आहे. सरकार साखर सम्राटांचे आहे. 
जन आंदोलन व सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. काटा मारणार्यांचा काटा स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार असून ७ नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. यावर कार्यवाही न झाल्यास १७ व १८ नोव्हेंबर ऊस तोड काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
एफआरपीसाठी ऊस उत्पादक शेतकर्यांनी भांडले पाहिजे. अन्याय सहन न करता विरोध करुन पेटून उठा. मेलेल्या लोकांचे लचके ज्याप्रमाणे गिधाडे तोडत आहे त्याप्रमाणे, साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकर्यांचे कमी भाव देऊन अन्याय करत आहे. साखर कारखानदार दिवसाढवळ्या शेतकर्यांची लूट करत असून साखरेचे उत्पन्न जास्त मिळत असतानाही कमी भाव देत आहेत. कारखानदारी अडचणीत आहे म्हणून कुणी आत्महत्या केली, असे उदाहरण घडले नाही. त्यामुळे या लुटीच्या विरोधात बोलले नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही. 
यावेळी संतोष वाडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील यांचे भाषणे झाली.

