महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले असून याद्वारे भविष्यात राज्यात अगणित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत ७५ हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यावेळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. काही प्रकल्प लवकरच सुरू होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 
केंद्र सरकार राज्यात इतकी मोठी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करत असेल तर त्यामधून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील. केंद्र सरकार समाजातील निम्न आणि पिछाडीवर असलेल्या लोकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 
केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये बचत गटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचत गटांना केंद्र सरकारने साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वतः उत्पादन तयार करतात, तसेच इतरांनाही रोजगार देतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गेल्या काही वर्षात संपूर्ण देशभरात बेरोजगारी आणि महागाईने उच्चांक गाठला आहे. दोन वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे देशातील तरुण मेटाकुटीला आले आहेत राज्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत ७५ हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्याला गुरुवारी महाराष्ट्रातून सुरुवात झाली.


