महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिर्डीतील एका अधिवेशननंतर सरकार पडले होते आता आमच्या अधिवेशनानंतर देखील शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे असे आम्ही स्नेही खासदार सुजय विखे पाटील यांना शिर्डीत जाऊन सांगणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व पाच नोव्हेंबर रोजी ‘राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा’ हे शिबिर होत आहे. या राज्यव्यापी शिबिरासाठी आजी-माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आधी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसचे अधिवेशन झाले त्यावेळी सरकार पडले होते, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन झाल्यावर त्यांचा पक्ष फुटेल, अशी टीका केली होती त्या संदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, विखे यांनीच तिथला पायगुण सांगितला याचे कौतुक वाटते. त्यामुळे आता आम्ही देखील शिर्डीत येऊन सांगणार आहोत की, अधिवेशनानंतर यापूर्वी सरकार पडले होते. आता आमच्या अधिवेशनानंतर देखील पुन्हा एकदा सरकार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम असून ती फुटण्याचा प्रश्नच नाही.
आगामी निवडणुकीत शक्यतो महाविकास आघाडीचाच प्रयत्न असेल. मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत शिंदे गटातील काही आमदारांनी संयम दाखवला त्याचे कौतुक वाटते. भाजपने डोळे बरोबर आघाडी केली आहे. त्यांची आघाडी केवळ एका गटासोबत आहे, पक्षासोबत नाही. त्यांचा उपयोग संपला की भाजपा त्यांना नारळ देईल आणि लगेचच मध्यावधी निवडणुका लागतील असे देखील पाटील म्हणाले.

