संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील घटना
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आईवडीलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला त्यांच्या कुशीतून ओढत त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. चिमुरड्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्यामुळे जाग्या झालेल्या आईवडीलांनी बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली.
विरु अजय पवार असे या चिमुरड्याचे नांव आहे. सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु आहे. यासाठी संगमनेर तालुक्यात काही ऊसतोडणी कामगार आले आहेत. थोरात कारखान्याच्या ऊसतोडणीशी संबधीत असलेले २० मजुरांचे जळगांव येथील कुटूंब आश्वी खुर्द येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ कोप्या टाकून राहत आहे. गुरुवारी रात्री हे ऊस तोडणी कामगार आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असतांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तेथे आलेल्या बिबट्याने आई वडीलांच्या कुशीत झोपलेल्या या चिमूरड्याला अलगदपणे आपल्या जबड्यात उचलले.
मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चिमुरडा जीवाच्या आकांताने ओरडू लागल्या जाग्या झालेल्या आई वडीलांनी समोरचे दृष्य बघताच त्यांची भितीने गाळण उडाली. अशाही अवस्थेत त्यांनी या चिमुरड्याला आपल्या जबड्यात घेवून जात असलेल्या बिबट्याचा पाठलाग केला. आरडाओरडीमुळे जागे झालेल्या अन्य मजुरांनीही चिमुरड्याला घेऊन १००-१५० फुटावर गेलेल्या बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. बराच प्रतिकार केल्यानंतर बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याला सोडविण्यात हे मजुर यशस्वी झाले. तोपर्यत चिमुरडा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर झाला होता. त्याच्या मानेवर खोलवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यातुन मोठा रक्तस्त्राव सुरु होता.
जखमी अवस्थेतच या चिमुरड्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगीतल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून अद्यापही या चिमुरड्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
संगमनेर-अकोले तालुक्यात बिबट्यांचा रहीवास मोठ्या संख्येने आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. विशेषत: लहान बालकांनादेखील बिबट्याने आत्तापर्यत लक्ष्य केल्याने वनविभागाचे स्थानिक अधिकारी मात्र यासंदर्भात फारसे गंभीर दिसत नाही.
घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य गणपत सांगळे, थोरात कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून माहिती घेतली माहिती मिळते. दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.


