अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर नजीकच्या हिवरगांव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामूळे आत्तापर्यत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली आरपारच्या लढाईच्या इशारा देत शुक्रवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.
टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल वसुलीचा फटका बसत असतांना या टोल प्रशासनावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कोणते झारीतील शुक्राचार्य पाठीशी घालत आहेत याचादेखील उलगडा होतांना दिसत नाही. टोल प्रशासनाला नेमके कोणाचे आशिर्वाद आहेत, त्यामुळे त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाही.
वारंवार सुचना देवून, आंदोलनाचे इशारे देवूनदेखील महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे बुजविले जात नाही. सर्व्हीस रोडची कामे केली जात नाहीत. दिशादर्शक गावांचे फलक लावले जात नाहीत. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला आळा घातला जात नाही. आदी कारणामुळे या टोल नाक्यावर वारंवार वाद होतांना दिसतात. अनेक कामे पुर्ण झालेली नसतांना, अनेक कामे अपूर्ण कामांकडे लक्ष दिले जात नसतांनादेखील येथे टोल वसुली जोरात सुरु आहे.
या मार्गावर झालेल्या अपघातास, त्यात झालेल्या अनेकांच्या मृत्यूस, त्यांना गंभीर इजा पोहोचविण्यात, कायमचे अपंगत्व आणण्यात, वाहनांच्या नुकसानीस टोल प्रशासनच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल करण्यास प्रशासन तयार नाही. अपघातात मृत्यू आल्याने अनेक घरातील कर्ते गमवावे लागले असल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीस जबाबदार असलेल्या टोल प्रशासन, पेट्रोलिंग व्यवस्थापन आणि संबधितांवर सदोष मणुष्यवधाचे गुन्हे दाखल करुन रस्त्याची कामे तातडीने पुर्ण करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉग्रेसने ही सर्व कामे पुर्णत्वास जाईपर्यत उपोषण करण्याचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे.
कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावर शुक्रवारी उपोषणाला सुरवात झाली आहे. पवार यांच्यासह अक्षय भालेराव, राहुल वर्पे, मनिष माळवे, किरण घोटेकर, नितीन अहिरे, अशोक काळे, प्रसाद काटे, गजानन भोसले, विकी पवार आदी पदाधिकारी, नागरिकांसह अनेकांनी यात सहभाग घेतला आहे.



