महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. अशावेळी राज्य सरकार महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचे सांगत आहे. तुम्ही भरती करणार असाल तर किती प्रकल्प राज्यात येणार आहे. आणि किती भरती करणार आहात. याची माहिती राज्याला द्या, असे जाहीर आव्हान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या शिबिराला शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. तत्पूर्वी पवार माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, “आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना आम्ही दरवर्षी 13 हजार पोलिसांची भरती केली होती. त्यानुसार पाच वर्षे एकूण 65 हजार पोलिसांची भरती केली होती. आता पोलीस भरतीची केवळ घोषणा करण्यात आली आणि ऐनवेळी भरती रद्द करण्यात आली.
आता देखील ज्या माध्यमातून दीड दोन लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या, दीड दोन लाख कोटींची गुंतवणूक येणार होते असे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले असताना आपले अपयश झाकण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकार सांगताहेत की, आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहोत तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या”.
“सध्या आपले प्रकल्प बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांच्या आणि तरुणींच्या मनात रोष आहे, नाराजी आहे. तरुणांच्या त्या नाराजीचा आपल्याला फटका बसू नये यासाठी, वरचेवर दिखावा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर प्रकल्प आमच्या काळात गेला सांगत असाल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र आता का लिहिले, याचेही उत्तर त्यांनी द्यावे”, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.
याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. “सध्याच्या सर्वे पाहिला असता देशात राज्यात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गेल्या महिन्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले.

