महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आपली सत्ता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच धोक्यात आणू शकतो याची जाण सत्ताधाऱ्यांना असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत याचाच अर्थ आपला पक्ष बलशाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या राज्यस्तरीय शिबिराला शुक्रवारी शिर्डीत सुरुवात झाली. यावेळी पाटील बोलत होते.
शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत आणि अस्वस्थ आहे. सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले. मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही. 
आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले, हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले, त्या बंडखोरीशी काही संबंध नाही असे म्हणणारे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीरपणे सांगितले. यावरून या बंडामागे कोण होते हे लक्षात येते, असेही जयंत पाटील म्हणाले.
या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्षा, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्षा, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.


