महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले टोल नाका प्रशासना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत आंदोलकांच्या मागण्या पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांना दिले.
अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जाऊन देखील, शेकडो लोक जखमी होऊन देखील, महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेकांना विकलांगपणा येऊन देखील जागे न होणाऱ्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाकडून केवळ वाहनचालकांकडून टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते.
पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसाळ्यातील दोन प्रशासनाच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या चार दिवसादरम्यान आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह काँग्रेसचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. टोल प्रशासनाच्या आखत्यारीमध्ये येत असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या अपघाता दरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अनेक लोक जखमी झाले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप शिंदे यांचे पुतणे आणि युवा उद्योजक जयवंत शिंदे यांच्या वाहनाला खड्ड्यांमुळे अपघात झाला होता. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर सकाळच्या वेळी ते जखमी अवस्थेत जवळच्या एका शेतामध्ये वाहनास आढळून आले. गंभीर जखमी असलेल्या शिंदे यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. मात्र याचे कोणतेही सोयर सुतक टोल प्रशासनाला नसल्याने त्यांच्याकडून केवळ टोल वसुलीचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमकपणे टोल प्रशासना विरोधात भूमिका घेत चार दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी आळेफाटा ते सिन्नर दरम्यान महामार्गाची पाहणी करून कपिल पवार व उपोषणकर्त्या सोबत चर्चा केली होती. मात्र जोपर्यंत ठाम निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले होते. चारही आमदार महोदयांनी उपोषणादरम्यान भेट देत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याविषयी सूचित केले होते. तसेच होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यामुळे सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड उपोषण स्थळी दाखल झाले. तहसीलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप शिंदे आदींसोबत चर्चा करत आंदोलकांच्या मागण्या 31 डिसेंबर अखेरपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन गोरड यांनी लेखी स्वरूपात आंदोलकांना दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल राऊत, उपाध्यक्ष नितीन अहिरे, सरचिटणीस गजानन भोसले, उपाध्यक्ष प्रसाद काळे, तालुका कार्याध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्ष तुषार वाळे, सरचिटणीस विकी पवार, कामगार तालुका अध्यक्ष शशिकांत पवार, सोशल मीडिया प्रमुख गणेश गुंजाळ आदींचा आंदोलनात सहभाग होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुलोक्षणा धर, स्वाभिमान मंडळाचे नेते शरद थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, गुलाब भोसले, दिनेश फटांगरे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती.

