महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
दिल्लीत टॅक्स इंडिया ऑनलाईन पोर्टल आयोजित अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असते. उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे एखाद्या देशाचा कसा विकास होतो, याचे उत्तम उदाहरण चीन आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे महाराष्ट्राचा मंत्री असताना मी रस्ते प्रकल्पासाठी निधी उभारू शकलो. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशाला अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असेल.
याशिवाय देशभरात 26 द्रुतगती मार्ग बांधण्यात येत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले आहे. “या एक्स्प्रेस वेमध्ये मला पैशांची कमतरता भासली नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महामार्गांच्या बांधकामासाठी सर्वसामान्यांकडून पैसे गोळा करत आहे. एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या 40,000 कोटी रुपयांवरून 2014 च्या अखेरीस 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल”.
देशातील गरीब लोकांना त्यांच्या जीवनात आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने भारताला उदार आर्थिक धोरण तयार करण्याचे नितांत गरज असल्याचे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.

