महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यभरातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयुक्त यु. पी. मदान यांनी जाहीर केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकाही याच दिवशी होणार आहेत.
ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची नोटीस स्थानिक ठिकाणचे तहसीलदार 18 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणार आहेत. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2022 या दरम्यान दाखल करावयाच्या आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार असून 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर थेट 18 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येईल. तर नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुका होत असलेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या :-
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196.

अहमदनगर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या तालुका निहाय ग्रामपंचायतची संख्या :-
अकोले 11, जामखेड 3, कर्जत 8, कोपरगाव 26, अहमदनगर 27, नेवासे 13, पारनेर 16, पाथर्डी 11, राहता 12, संगमनेर 37, शेवगाव 12, श्रीरामपूर 6, राहुरी 11 आणि श्रीगोंदे 10.

